(मतीन शेख)
जळगाव जामोद: तालुक्यातील सुनगाव येथे सुरू असलेल्या स्मशानभूमीच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ग्रामस्थ अनंता गणपत धुळे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मंगळवारी दि.१० मार्च रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुनगाव येथे सध्या स्मशानभूमीचे बांधकाम सुरू असून काम करताना मंजूर अंदाजपत्रकातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक असलेला माहिती फलक (नेमप्लेट) अद्याप लावण्यात आलेला नसल्याने या कामासाठी किती निधी मंजूर आहे तसेच कंत्राटदार कोण आहे, याची माहिती ग्रामस्थांना मिळत नसल्याची बाबही समोर आली आहे. तक्रारीनुसार, बांधकामासाठी शासनाने प्रमाणित केलेली वाळू वापरणे बंधनकारक असताना त्याऐवजी गावातील स्थानिक नद्यांमधून आणलेली मातीमिश्रित वाळू वापरली जात आहे. या वाळूमध्ये मातीचे प्रमाण जास्त असल्याने बांधकामाचा दर्जा खालावत असून भविष्यात ही इमारत धोकादायक ठरू शकते, अशी भीती अनंता धुळे यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कामाची पाहणी करण्यासाठीही फिरकत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याने कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्यांचे संगनमत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणामुळे जळगाव जामोद तालुक्यात खळबळ उडाली असून जिल्हा परिषद प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामाची तांत्रिक तपासणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.