(मतीन शेख)
अकोला : रमजान ईद जवळ येत असताना शहरातील विविध ईदगाह परिसरांची दुरवस्था दूर करून तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन देऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पवित्र रमजान ईदच्या दिवशी शहरातील हजारो मुस्लिम बांधव ईदगाहांवर एकत्र येऊन नमाज अदा करतात. मात्र अनेक ईदगाह परिसरात अस्वच्छता, नादुरुस्त पथदिवे तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे मनपा प्रशासनाने ईदपूर्वी सर्व ईदगाह परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी, रंगरंगोटी करावी आणि बंद पडलेले पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ईदच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक नमाज पठणासाठी येत असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी पाणीटँकर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांना नमाज पठणाच्या वेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मनपा प्रशासनाने विशेष नियोजन करावे असेही आमदार पठाण यांनी नमूद केले आहे. दरम्यान, हरिहर पेठ येथील ईदगाह मैदानाच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही ईदची नमाज अदा केली जाणार असल्याने मैदान परिसरात तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परिसरात झालेली अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करावी, जेणेकरून नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही असेही त्यांनी प्रशासनाला सूचित केले. यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी हरिहर पेठ येथील ईदगाह परिसराची पाहणी केली. अकोला शहराचे काझी फैजान काझिमुद्दीन काझी यांच्या उपस्थितीत ईदगाह परिसराचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी याकूब पहलवान, सोहेल खान (आर्किटेक्ट), मोहम्मद शरीक, नईम फराज, रिजवान खान, समीर खान, सोनू पठान यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.