(मतीन शेख)
अकोला : जुन्या वादातून पेटलेल्या रागामुळे रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळीच शस्त्रहल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात मुर्तिजापूर तालुक्यातील उमाळी गावातील दीपक अवधूत वानखडे वय ४२ ठार झाले, तर त्यांचे काका श्रीराम पांडुरंग वानखडे वय ६२ जखमी झाले. या घटनेमुळे मुर्तिजापूर तालुका हादरून गेला आहे. दीपक वानखडे व त्यांचे काका रस्त्याने जात असताना आरोपी गजानन मानकर यांनी त्यांना अडवले. जुन्या वादातून सुरुवातीला किरकोळ वाद झाला. हा वाद पाहता पाहता हाणामारीत परिवर्तित झाला. याच वेळी संतापलेल्या गजानन मानकर यांनी शस्त्र बाहेर काढले. त्यांनी काका-पुतण्यावर थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दीपक वानखडे जागीच ठार झाला असून स्थानिकांनी तातडीने त्यांचे काका श्रीराम वानखडे यांना उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथे दाखल केले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आपल्या पथकासह परिसरात शोधमोहीम राबवली. अवघ्या अर्ध्या तासात आरोपी गजानन मानकर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादामुळे उफाळलेले हे प्रकरण थेट जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.