(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्ही सवडद गावात मुलानेच आपल्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या दुहेरी हत्येमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश महादेव चोपडे वय ३१ याने शनिवारी, २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास वडील महादेव त्र्यंबक चोपडे वय ७० व आई कलावतीबाई चोपडे वय ६५ यांच्यावर घरातच हल्ला चढवून दोघांचा जागीच खून केला. शेती विक्रीबाबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा नोंदवला असून आरोपी गणेश याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून, नातेसंबंधांतील वितुष्ट किती टोकाचे होऊ शकते, याचे हे भयावह उदाहरण असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.