(मतीन शेख)
बुलढाणा: बावनबीर गावातील नदीपात्रामध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणावर महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त उपस्थितीत मोठी कारवाई करण्यात आली. गावातील नदीपात्रातील अतिक्रमण हटवून नैसर्गिक प्रवाह मोकळा करण्यात आला. विशेष म्हणजे, बावनबीर गावातील ही अशा प्रकारची पहिली मोठी अतिक्रमण हटाव मोहीम ठरली. गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सन २०२३ मध्ये परिसरात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर नदीपात्रातील अतिक्रमणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी आणि नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन, तामगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे तसेच सोनाळा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक महादेव खोने पोलिस पाटील रेणुकाताई तसेच तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार राहुल विसावे सरपंच गजानन मनसुटे उपसरपंच शेख नजीर तंटामुक्ती अध्यक्ष शेख वसिमहे उपस्थित होते. या मोहिमेदरम्यान गावकऱ्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केले. नदीपात्र अतिक्रमणमुक्त केल्यामुळे भविष्यात पूराचा धोका कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठीही ही कारवाई उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.