(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बोडखा ते भिलखेड मार्गावरील पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर संबंधित विभागाने पुलावरील खड्डा तातडीने बुजवून रस्ता सुरक्षित केला. यासंदर्भात अमोल ठाकरे यांनी ६ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता धुंदळे यांची भेट घेऊन खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच यापूर्वी ७ जुलै रोजीही सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्त्यावरील धोकादायक स्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. या पाठपुराव्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभागाने ७ ऑगस्ट रोजी बोडखा-भिलखेड मार्गावरील पुलावरील खड्डा बुजवून वाहतुकीसाठी रस्ता सुरक्षित केला. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अजय पारस्कर, किसान सेनेचे तालुकाप्रमुख मोहन ठाकरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक टावरी, जळगाव जामोद शहरप्रमुख अरुण ताडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नागरिकांनी या तातडीच्या दुरुस्तीबद्दल समाधान व्यक्त केले.