(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वरवट बकाल येथील बसस्थानक चौकातील सुमारे १०० वर्षे जुने वृक्ष तोडण्याच्या हालचालींविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत असलेले हे वृक्ष संबंधित अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये तोडण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने यांनी तहसीलदारांना निवेदन देत सदर वृक्ष तोडू नये, तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मनाई आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, “जर वृक्षतोड थांबवली नाही तर विद्युत वाहिनीच्या खांबावर किंवा टॉवरवर चढून ‘शोले’ शैलीत आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान माझ्या जीवितास काही हानी झाल्यास त्यास संबंधित यंत्रणा जबाबदार राहील.” सदर निवेदन तहसीलदारांसह जिल्हाधिकाऱ्यांना आणि तामगाव पोलीस ठाण्यातही देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वृक्षप्रेमींनी भोजने यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे.