(मतीन शेख)
अकोला : उर्दू माध्यमाच्या शिक्षकांशी संबंधित चार गंभीर प्रश्न उपस्थित करीत आमदार साजिद खान पठाण यांनी पंचायत राज समितीकडे तक्रार केली आहे. या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त १३ उर्दू शिक्षक ऑगस्ट २०२४ मध्ये सेवेत रुजू झाले; मात्र त्यांना सहा महिने शाळा मिळाली नसल्याचा आरोप आहे. यामुळे सेवाज्येष्ठता, वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात १०४ उर्दू शाळा असताना किमान १० उर्दू केंद्र समन्वयक पदांची पदनिश्चिती अपेक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्याऐवजी ४२ केंद्र समन्वयकांची पदोन्नती झाल्याचा आरोप तक्रारीत आहे. २०२५ मधील बदली प्रकरणानंतर निलंबित ३३ शिक्षकांच्या मुख्यालय निश्चितीतही कथित दुजाभाव झाल्याचा आरोप आहे. १५ शिक्षकांना अकोला पंचायत समितीतच ठेवण्यात आले, तर तीन उर्दू शिक्षकांचे मुख्यालय इतरत्र बदलण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय, उर्दू शहर कन्याशाळेतील मुख्याध्यापक पद सुमारे वर्षभरापासून रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. नियुक्ती, शाळा वाटप, पदनिश्चिती, बदली, निलंबन आणि मुख्यालय निश्चितीची कागदपत्रे तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. दोष आढळल्यास शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार पठाण यांनी केली आहे.