(मतीन शेख)
संग्रामपूर : तालुक्यातील बावनबीर गावात गुरुवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. खांबावर काम करत असताना खाजगी वायरमन कलीम खान अब्बास खान वय ५५ रा. बावनबीर यांना अचानक करंट लागला. सदर वायरमन हे शासकीय वायरमनच्या देखरेखीखाली काम करत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. करंटचा तीव्र झटका बसल्यानंतर त्यांना तातडीने संग्रामपूर येथील महावितरणच्या वाहनातून वरवट येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी तातडीने कलीम खान यांना शेगाव येथील जीवनज्योती हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, सध्या तेथे इमर्जन्सी विभागात उपचाराधीन आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर बावनबीर गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थ त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, कलीम खान हे आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबातून येत असल्याने महावितरण विभागाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी केली आहे.