(मतीन शेख)
अकोट: उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान “आय लव मोहम्मद” असे फलक हातात धरल्याच्या कारणावरून २५ मुस्लिम नागरिकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे असंवैधानिक असून ते त्वरित मागे घ्यावेत, अशी मागणी अकोट येथील मुस्लिम समाजबांधवांनी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपविभागीय अधिकारी मार्फत राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कानपूर पोलीस प्रशासनाने दाखल केलेले हे गुन्हे भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य व मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहेत. संविधानाचे कलम १४, १९ आणि २१ हे सर्व नागरिकांना समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य यांची हमी देतात. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने आपल्या धर्माविषयी प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा ठरू शकत नाही, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व दोषमुक्त व्यक्तींवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी ठाम भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेश शासन व प्रशासनाने संविधानाने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे पालन करावे यासाठी राष्ट्रपतींनी संबंधित यंत्रणांना सक्त आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर मोहम्मद जोहर, हाफीज मतीन खान, नगरसेवक अजहर शेख, ॲड. गुलाम हुसेन, अवेज कुरेशी, अजमत खान, अहमद परवेज, गुलाम साबीर, मोहम्मद एजाज, शेख सरफराज, अनिस रजा, जुबेर खान यांच्यासह अनेक मुस्लिम समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.