(मतीन शेख)
बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील बौद्ध समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तहसीलदार यांना ८ जुन रोजी स्मरणपत्र सादर करण्यात आले. यापूर्वीही या संदर्भात ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली होती. बौद्ध समाजाच्या वतीने १९ जुलै २०२४ रोजी बावनबीर ग्रामपंचायतीकडे स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयातही यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने बौद्ध समाजाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात तसेच इतर वेळी अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे. या प्रश्नामुळे बौद्ध समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून बावनबीर ग्रामपंचायत हद्दीतील उपलब्ध शासकीय जागेची तातडीने पाहणी करून बौद्ध समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास येत्या दहा दिवसांनंतर आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही बौद्ध समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.