(मतीन शेख)
बुलढाणा : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात-कठोर शिक्षा द्यावी तसेच सखोल तपास करून सर्व गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी मराठा समाज संग्रामपूर तालुक्याच्या वतीने तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही समस्त मानव जातीसाठी व महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजविणारी गोष्ट आहे. समाज माध्यमावरून व्हायरल झालेल्या संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो पाहून अंतकरण पिळवटून निघत आहे. एखाद्या रानटी हिंसक श्वापदांनी मिळून एखाद्या पक्षाला ठार मारावे अशा प्रकारे झालेली ही निर्घृण हत्या मानव जातीला न शोभणारी असून मानव जातीला काळीमा फासणारी निश्चितपणे आहे. अशा प्रकारे झालेली ही निर्घुण हत्या जनसामान्यांच्या भावना संतप्त करणारी आहे. ‘हम करे सो कायदा’ याप्रमाणे या नराधमांनी न्यायालयातून जामीन मिळाल्याच्या दोनच दिवसानंतर केलेले कृत्य हे केवळ कायद्याची भीती न उतरल्याचे प्रतीक आहे. नराधमांनी केलेल्या कृत्याची स्वतंत्र तपास यंत्रणेद्वारे तपास करून विद्वान वकील नेमावेत. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, तसेच या प्रकरणांमध्ये दोशी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरही निलंबनासह त्यांच्यावर टर्मिनेट ची कारवाई करावी कारण या घटनेमध्ये पोलिसांनी स्पेशल गुन्हेगारांना मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यामध्ये दोषी पोलिसांना सहआरोपी करावे अशी मागणी संग्रामपुर तालुका मराठा समाज यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी स्वप्निल देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, अमोल ठाकरे, अभयसिंग मारोडे, पुंडलीक खानझोड, डाँ विवेक देशमुख, राहुल मेटांगे, अजय घिवे, ओमप्रकाश देशमुख, अनुप देशमुख, विवेक राऊत, शिवशंकर अढाव, शाम देशमुख तसेच संग्रामपूर तालुक्यातील मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.