(मतीन शेख)
संग्रामपूर: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासीबहुल वसाली गावातील छत्रपती शिवाजी महाराज इको पार्क येथे १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भोंगळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या वेळी बोलताना भोंगळ यांनी सांगितले की, रयतेचे जाणते राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या अद्वितीय नेतृत्वगुणांनी गरीब, कष्टकरी व बहुजन समाजाला स्वाभिमान व सामर्थ्य दिले. त्यांचा प्रेरणादायी इतिहास अखंड भारतासाठी सदैव मार्गदर्शक राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवजयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक, पूजन व पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. “शिवाजी महाराज की जय”, “जय शिवाजी जय भवानी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमास वनविभागाचे अधिकारी बावणे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने, माजी सरपंच हुसेन पालकर, नारायण ढगे, राजेश आमटे, श्रीकांत वरणकार, साबीर खान, संदीप दामधर, पप्पू पठाण, नंदू अढाव, राहुल शिरसोले, अजय सोनी, अर्जुन शिवणकर, वनपाल सोळंके, वनरक्षक पारधी, बेराड, काठोडे, भोयार, गरुड मॅडम, प्रणव देशमुख, निखिल भाकरे, उज्वल पाटील, प्रकाश भिसे, विठ्ठल निबोळकर आदींसह वन कर्मचारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती उत्साहात साजरी करत शिवचरित्राचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.