(मतीन शेख)
बुलढाणा: जिल्ह्यातील राजकारणात नव्या शक्तीचा उदय होत असून विविध लहान-मोठ्या पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत पर्यायी तिसऱ्या आघाडीचा बिगुल वाजवला आहे. आज दि.१० नोव्हेंबर रोजी खामगाव येथील आदर्श हॉटेलमध्ये विविध पक्ष संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत “बुलढाणा जिल्ह्यात नव्या शक्तीचा जन्म, छोटी-मोठी मिळून तिसरी भक्कम आघाडी तयार” असा ठोस संदेश देण्यात आला. पारंपारिक राजकारणाला धक्का देत सुमारे १५ हून अधिक पक्ष व संघटना एका मंचावर आल्या असून, अजूनही समविचारी पक्षांशी चर्चेला गती दिली जात आहे. बैठकीचे अध्यक्ष सुजित बांगर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “बुलढाणा जिल्हा बदलाच्या उंबरठ्यावर आहे. विविध पक्ष आणि संघटना आता एकाच दिशेने पुढे सरकत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित शक्तीने लढविल्या तर सत्ताधाऱ्यांना धक्का देणे शक्य आहे.” आगामी नगरपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आघाडी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकते, असा सूर या बैठकीतून उमटला. या बैठकीस मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी इंडिया, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, ऑल इंडिया पँथर सेना, आझाद समाज पार्टी, रिपब्लिकन सेना, समाज क्रांती आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर), राष्ट्रीय किसान सभा, भीम आर्मी–भारत एकता मिशन, बहुजन मुक्ती पार्टी, दिव्यांग क्रांती आघाडी आदी समविचारी पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक यशस्वी करण्यासाठी सुजित बांगर आणि सागर मोरे यांनी विशेष प्रयत्न केले.