(मतीन शेख)
संग्रामपूर: अंबाबरवा अभयारण्य येथे वने व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन तसेच वन पर्यटन व्यवस्थापन या क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनरक्षक देव बेराड यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. वनसंपदेचे जतन, वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण आणि पर्यटकांसाठी सुयोग्य व शाश्वत वन पर्यटन व्यवस्था उभारण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे अभयारण्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळाली असून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीही प्रभावीपणे होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमरावती येथे मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक वनविभाग अमरावती यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असून भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे वन संवर्धनाची वाटचाल अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.त्यावेळी उपवनसंरक्षक अकोट, उपवनसंरक्षक सिपना, उपवनसंरक्षक गुगामल व इतर मान्यवर उपस्थित होते.